खोपोली | शिवाजी जाधवप्रभाग क्रमांक दहा अंतर्गत समर्थ नगर येथील अनिल आंग्रे यांच्या घरासमोरून गेलेले मोठे गटार गेल्या तब्बल वर्षभरापासून साफसफाईअभावी तुंबले होते. गटारातील कचरा, गाळ साचल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. पावसाळ्यात गटार तुंबून पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढून लहान मुलांसह वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर या प्रश्नाची दखल पत्रकार शिवाजी जाधव यांनी घेतली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे तात्काळ तक्रार दाखल करून जेसीबी मशीनद्वारे गटार साफसफाईची मागणी केली.
पत्रकार शिवाजी जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपालिकेने दखल घेत जेसीबी मशीन पाठवले. जेसीबीच्या सहाय्याने गटारातील साचलेला कचरा, गाळ व अडथळे पूर्णपणे काढून टाकण्यात आले. त्यामुळे गटार मोकळे होऊन परिसरात साचलेले पाणी वाहू लागले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या साफसफाईच्या कामावेळी स्थानिक नागरिक, आंग्रे कुटुंबीय उपस्थित होते. गटार स्वच्छ झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत पत्रकार शिवाजी जाधव यांच्या सामाजिक बांधिलकीचे व तत्परतेचे कौतुक केले. वर्षभरापासून प्रलंबित असलेली समस्या पत्रकाराच्या हस्तक्षेपामुळे सुटल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले.


Post a Comment
0 Comments