Type Here to Get Search Results !

*26 नोव्हेंबर — भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या राज्यघटनेने देशाचा बदलला इतिहास! 🇮🇳*



          खोपोली : (प्रतिनिधी) : 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सुवर्णक्षण. देशाच्या भवितव्याला दिशा देणारी, सर्वांना समान न्याय, स्वातंत्र्य व बंधुता देणारी भारतीय राज्यघटना आजच्याच दिवशी स्वीकारण्यात आली. या महान कार्यामागे उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच मानवतेचे दैवत, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 



        देशातील सर्व घटकांना समान हक्क देणारी, दुर्बल, शोषित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणणारी ही राज्यघटना बाबासाहेबांच्या कुशाग्र बुद्धीची, प्रचंड अभ्यासाची आणि अढळ संघर्षाची साक्ष देते. त्यांच्या लेखणीने लिहिलेला प्रत्येक शब्द केवळ कायदा नव्हे, तर भारतीय जनतेसाठी जीवनमूल्य आहे.



       डॉ. आंबेडकरांनी आपल्या विचारांनी समाजाला शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा त्रिसूत्री मंत्र दिला. त्यांचे विचार आजही प्रत्येक भारतीय तरुणाला नवी उमेद देतात. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा संदेश समाजपरिवर्तनाचा दीपस्तंभ आहे.




        बाबासाहेबांनी समाजातील असमानतेशी लढा देत, जिद्द, ध्यास आणि परिश्रमाने जगाला दाखवून दिले की शिक्षण आणि विचारांची ताकद किती मोठी असते. आज त्यांच्या आदर्शांच्या आधारे भारत न्याय, धर्मनिरपेक्षता, समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसह जगात सर्वात मोठ्या लोकशाही म्हणून ओळखला जातो.




         भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर बाबासाहेबांच्या विचारांचे तेज आजही झळकत आहे. त्यांनी देशाला दिलेले हक्क, स्वातंत्र्य आणि नागरिकत्वाचा अभिमान आज प्रत्येक भारतीयाला मोकळेपणाने श्वास घेण्याचा अधिकार देतात.


       त्यांच्या योगदानामुळेच 26 नोव्हेंबरचा दिवस भारतीय इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.


        आज संविधान दिनानिमित्त संपूर्ण देशभरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रम, कार्यक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे.


           बाबासाहेबांचा विचार, भारताचा श्वास…

          राज्यघटना आमची, अभिमानही आमचाच!

Post a Comment

0 Comments